श्री. जयप्रकाश झेंडे सर यांच्या ‘आयुष्य समृद्ध करणाऱ्या 51 प्रेरणादायी चरित्रकथा’ या पुस्तकाचे सखोल वाचन-चिंतन करताना मला मनस्वी आनंद होत आहे.
प्रेरक गोष्टींमध्ये आयुष्य उन्नत करण्याची क्षमता असते. त्या आपल्याला हसवतात, रडवतात, प्रोत्साहित करतात व प्रेरणा देतात. आयुष्य समृद्ध करण्यासाठी महत्त्वाचे आणि उपयुक्त धडे शिकवितात. या पुस्तकात अशा काही गोष्टी, अशी काही माणसं आपल्याला भेटतील ज्या गोष्टी, जी माणसं आपल्याला बलवान बनवून आपल्यात समृद्ध जीवनाचा अंकुर रुजवतील अशी माझी श्रद्धा आहे.
‘‘मराठी पुस्तकांना वाचक मिळत नाहीत. मराठीचे काही खरे नाही.’’ अशी ओरड चालू असताना असे सकस लेखन वाचकांच्या हाती पडणार असेल तर मला वाटते की, मराठी पुस्तकांबद्दल काही लोकांच्या मनात असलेली ही भावना नक्कीच कमी होऊ शकेल. एका विशिष्ट वयाआधी आणि विशिष्ट वयानंतर कथा-कादंबर्यांकडे वाचकांचे फारसे लक्ष जात नाही. कदाचित अभ्यासकांचे आणि टीकाकारांचे जात असेल. तरुण पिढीला सहजपणे घडविण्याची किमया लेखनात असणे हे चांगल्या लिखाणाचे फार महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
तरुणपणी आजीच्या गोष्टी ऐकण्याचे वय सरलेले असते आणि विद्वत्ताप्रचुर भाषेत लिहिलेले प्रबोधनात्मक वाङ्मय वाचण्याचीही प्रवृत्ती झालेली नसते अशावेळी सहजरीत्या नवी वाटचाल करण्याची दिशा दाखविणारे, अंगी नवे विचार बिंबविणारे, साध्या सरळ भाषेत लिहिलेले असे काही वाचावयास मिळाले, तर ते तरुणांना आणि पालकांनाही रुचणारे ठरते.
प्रस्तुत लिखाण अशाच स्वरूपाचे, न कंटाळता वाचले जाणारे नि वाचता वाचता त्यातून काही शिकायला मिळणारे असे आहे..
ज्या वयात व्यक्तीच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार असते अशा वयात *‘आयुष्य समृद्ध करणाऱ्या 51 प्रेरणादायी चरित्रकथा’ यासारखी पुस्तके उपलब्ध होणे आवश्यक असते.
इसापनीती, पंचतंत्र अशी पुस्तके वाचण्याचे वय संपले की, गरज असते ती प्रत्यक्ष अनुभूतीच्या अभिव्यक्तीवर आधारलेल्या पुस्तकांची, समाजातील सर्जन, सात्त्विकशक्तींची ओळख होण्याची.
वाचनातून विचारप्रवृत्त केले जाईल, सुष्ट-दुष्ट शक्तींची जाणीव होईल, अविवेकाची काजळी झटकून विवेकाची दिवाळी साजरी करण्याची मनाची तयारी करता येईल. अशा साहित्य वाचनातून सुसंस्कृत पिढी घडविण्याचे कार्य आपोआप होईल.
‘संयमी व्हा’ ही गोष्ट वाचली की, कार्यतत्पर, स्वत:चे दु:ख विसरून रोग्याला जीवदान देणाऱ्या डॉक्टरांबद्दल आदर निर्माण होतोच, त्याहीपेक्षा उतावीळपणाने, सारासारविचार न करता बोलणे किती घातक ठरते हेही कळते. यातील काही गोष्टी उपदेशपर आहेत, तर काही प्रेरणादायी आहेत; तसेच काही आपल्या देशात तर काही पाश्चात्त्य देशात घडलेल्याही आहेत...
श्री. जयप्रकाश सरांनी या कथांद्वारे प्रबोधनकारी मूल्ये घेऊन ती आपल्यापर्यंत संस्कारित केलेली आहेत.* या कथासंग्रहात आपल्याकडील आणि पाश्चात्त्य देशातील कथा असा दुजाभाव त्यांनी केलेला नाही. जे उत्तम, उदात्त आहे ते त्यांनी उचललेले आहे आणि त्यांची वाचनीय आणि मननीय अशा कथांची एक माळ वाचकांच्या समोर ठेवली आहे. येथे एक गोष्ट आवर्जून लक्षात आणून दिली पाहिजे...
या कथा केवळ वाचून हातावेगळ्या कराव्यात हा लेखकाचा उद्देश नाही; तर त्या स्पृहणीय म्हणजे अनुकरणीय ठराव्यात हे त्यांना अभिप्रेत आहे.
-आपलाच पुस्तक समीक्षक:
विद्यार्थी मित्र प्रा. रफीक शेख
डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम फाउंडेशन,परभणी.
Post a Comment