🎓 *सध्याच्या परिस्थितीत सर्व नकारात्मकतेला पुरून उरेल एक असा सुंदर लेख खास आपणासाठी.. मित्रांनो...*
*वेळात वेळ काढून एकदा अवश्य काळजीपूर्वक वाचा बरं का...* 😊
🎓 *सकारात्मकतेचे फळ....!*
_सकारात्मक विचारसरणीत कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत आपल्यात उपयुक्त बदल घडवून आणण्याची ताकद, सामर्थ्य असते. त्यामुळे प्रतिकूलतेचे अनुकूलतेत रूपांतर होऊ शकते. त्यामुळे परिस्थिती सुखकारक बनते. आपल्या क्षमता आणि कौशल्य वाढते. सकारात्मक विचारसरणीमुळे अशक्य, अवघड वाटणाऱ्या गोष्टी सोप्या आणि सुलभ होतात. आपले नेमके ध्येय काय आहे यावर आपल्याला लक्ष केंद्रित करता येते. अचानक नवीन आणि उपयुक्त कल्पना सुचतात. सकारात्मक भावनांमुळे अनेक शक्यता दृष्टोत्पत्तीस येतात; तसेच आपल्यासमोर अनेक पर्यायही खुले होतात._
एक घनदाट जंगल होते. जंगलातून खळखळणाऱ्या नदीचा मोठा प्रवाह वाहत होता. जंगलात अनेक प्राणी राहत होते. ‘गुण्यागोविंदाने’ म्हणता येणार नाही; कारण जंगलात ‘बळी तो कान पिळी’ या नियमाचे अधिराज्य असते. अर्थात मानवसमाजदेखील याला अपवाद नाही.
असे असले तरी जंगलात लहान-मोठे,. ताकदवान-कमकुवत, क्रूर-मवाळ प्राणी आपापल्या पद्धतीने जीवन जगत असतात. *स्वसंरक्षणाचे ज्ञान निसर्गानेच सर्व प्राण्यांना उपजतच दिलेले असते आणि त्याचा पुरेपूर उपयोग करीत ते जगत असतात.*
*संकट ओढावले....!*😱
अशीच एक हरिणी त्या जंगलात वावरत, जगत असते. तिची प्रसूतीची वेळ जवळ आलेली असते आणि त्यासाठी लागणाऱ्या सुरक्षित जागेच्या ती शोधात असते.
शोधता, शोधता ती एका खळाळणाऱ्या नदीप्रवाहाजवळच्या घनदाट जंगलात पोहोचते. सर्व दृष्टीनेही जागा योग्य आहे असे तिला वाटते.
त्याचवेळी एकदम तिला प्रसूती वेदना सुरू होतात. जणू तीच वेळ साधून आकाश कृष्णमेघांनी भरून येते आणि त्यावर प्रचंड विजा कडाडू लागतात. त्याचा परिणाम म्हणून जंगलात मोठी आग लागते. एकदा संकटांची सुरुवात झाली की, कधी त्यांची मालिका तयार होते हे लक्षातच येत नाही. हरिणीचे हृदय भीतीने धडधडू लागते. सहजच तिची नजर आपल्या उजव्या बाजूला जाते तेव्हा तिच्या लक्षात येते की, एक शिकारी तिच्यावर बंदूक रोखून उभा आहे. भीतीने थरथरतच ती डाव्या बाजूला बघते तो काय एक भुकेला सिंह तिच्यावर आक्रमण करण्याच्या उद्देशाने पुढे पुढे सरकत असतो.
आता या हरिणाने काय करायचे?
प्रसूती वेदनांनी तर तिला जखडून टाकलेले असते. काय होणार अशा परिस्थितीत तिचे? ती हरिणी सुरक्षित राहू शकेल का? ती आपल्या बाळाला जन्म देऊ शकेल का? जन्म दिलाच तरी तिचे बाळ सुरक्षित राहू शकेल का? की, हे सारेच जंगलात लागलेल्या आगीच्या मोठ्या वणव्यात पडून भस्मसात होणार आहे? कोण वाचविणार तिला या संकटातून?
*अर्थात या संकटातून वाचल्यावरदेखील तो शिकारी तिला जगू देणार आहे का?*
🎯 *ध्येयावरील अविचलता...!*
क्षणोक्षणी, काळ हरिणीच्या जवळ येत होता. म्हणजे हरिणीच्या एका बाजूला जंगलातील आग आहे. दुसऱ्या बाजूला वेगाने खळाळत वाहणारा पाण्याचा प्रचंड मोठा प्रवाह आहे. तिसऱ्या बाजूला बंदूकधारी शिकारी आणि चौथ्या बाजूला भुकेलेला आणि चवताळलेला सिंह तिच्यावर झडप घालण्यासाठी टपून बसलेला आहे. अशा चारही बाजूंनी संकटांनी घेरलेल्या परिस्थितीचा सामना ती हरिणी कसा करू शकते?
दशदिशांपैकी दोनच बाजूंनी मदत मिळण्याची शक्यता वाटते आहे ती म्हणजे आकाश आणि पृथ्वी. या परिस्थितीतदेखील ती आपल्या नवजात बालकाला जन्म द्यायचे ठरविते.
त्यावरच लक्ष केंद्रित करते. कारण हेच आपले प्रथम कर्तव्य आहे याची जाणीव तिला असते. त्यानंतर घडलेल्या सर्वच गोष्टी आश्चर्यकारक आणि माणसाच्या तर्कापलीकडच्या होत्या.
काय झाले असावे पुढे...?🤔
निमिषार्धात कडाडलेल्या विजेमुळे शिकाऱ्याच्या डोळ्यापुढे क्षणभर अंधेरी आली, त्याने हरिणीवर धरलेला बंदुकीचा नेम चुकला आणि त्यातील गोळी सरळ भुकेलेल्या सिंहाला लागली. आकाशातून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जंगलात लागलेली आग हळूहळू विझायला लागली. अग्निदेवता शांत झाली. गरीब हरिणीला निसर्गदेवतेनेच केलेली मदत बघून शिकाऱ्याचे हृदयपरिवर्तन झाले. त्याला हरिणीची दया आली आणि त्याने तिची शिकार न करण्याचा निर्णय घेतला. या सर्व गदारोळातच हरिणीने एका गोंडस पाडसाला जन्म दिला.
🎯 *आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा..*
नेमकं असंच आपल्या सर्वांच्या आयुष्यात घडत असतं नाही का? जेव्हा आपण चहूबाजूंनी संकटांनी, समस्यांनी घेरले जातो तेव्हा नकारात्मक विचार पूर्णपणे आपल्या मनाचा ताबा घेत असतात. बचावाची कोणतीही शक्यता आपल्या नजरेपुढे दिसत नाही.
अशा वेळेस विचार करण्याची शक्तीच पूर्णपणे नष्ट होते. आता आपल्या बाबतीत सर्वकाही संपलेले आहे असे वाटते. तेव्हा या हरिणीवर बेतलेल्या प्रसंगाची आठवण करा. आपल्या मूलभूत कर्तव्यावर पूर्णपणे आपले लक्ष केंद्रित करा जसे त्या हरिणीने केले होते.
*संपूर्ण नकारात्मक परिस्थिती उत्पन्न झाल्यावरदेखील त्या हरिणीने आपल्या मूलभूत कर्तव्यावर म्हणजे अर्भकाला जन्म देण्यावर आपले संपूर्ण लक्ष केंद्रित केले जे तिचे प्रथम कर्तव्य होते. बाकी जगणं वा मरणं यावर तिचं काहीही नियंत्रण नव्हतं. तिच्या हातात काहीच नव्हतं, इतकंच नाही तर घडत असणाऱ्या या गोष्टीवरची तिची कोणतीही प्रतिक्रिया तिचा आणि तिच्या नवजात पाडसाचा जीव धोक्यात टाकणारीच ठरली असती. त्याचप्रमाणे अशाप्रसंगी आपल्यादेखील आपल्या मूलभूत, प्राथमिक कर्तव्यांवरच लक्ष केंद्रित करायला हवे, नाही का? आपण स्वत:ला प्रश्न विचारायला हवा की, आपला मुख्य उद्देश काय आहे? आपले कर्तव्य काय आहे? आपण प्रामुख्याने कशावर लक्ष केंद्रित करायला हवे? आपल्या महत्त्वाकांक्षा काय आहेत? अशा संकटात सापडल्यावर आपण आपल्या निर्मात्याची, आर्ततेने आठवण करायला हवी. त्याच्यावर श्रद्धा ठेवायला हवी. जो आपल्या शरीरात, हृदयात वास करतो आणि तोच आपला खरा सहायक आणि रक्षणकर्ता आहे.*
Post a Comment