सर्वात वाईट निरक्षर जर कुणाला म्हणावं तर राजकीय निरक्षराला. तो राजकारणाबद्दल ऐकत नाही किंवा बोलतही नाही. कुठल्याही राजकीय प्रक्रियेपासून तो नेहमी अंतर ठेऊन राहतो, त्या प्रक्रियेत तो सहभागी सुद्धा होत नाही.पण त्याला हे कळत नाही की डाळीचे भाव, मासळीचे दर, पिठामिठाची किंमत, पायातले जोडे, घरभाडे, औषधी या आणि जगण्यासाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीची किंमत किंबहुना जगण्याचीच किंमतच राजकीय निर्णयावरून ठरत असते.
आपल्या राजकीय अजाणतेपणाचा त्याला गर्व वाटतो आणि छाती फुगवून सांगत राहतो की मी राजकारणाचा द्वेष करतो. राजकारणाबद्दल अज्ञाणी अशा त्या मुर्खाला हे कळत नाही की त्याच्या अज्ञानातूनच निर्माण होते शोषण करणारी व्यवस्था आणि तीच व्यवस्था जन्माला घालते एखादं बेवारस मूल, वेश्या आणि दरोडेखोर. आणि सर्वात वाईट म्हणजे ती व्यवस्था भ्रष्ट अधिकारी, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे तळवे चाटणारे लोक निर्माण करते.
चांगल्या वाईट राजकारणाचे जनतेवर, समाजावर आणि देशावर काय परिणाम :-
राजकारणी वाईट आणि स्वार्थी असेल तर..
जनतेवर ....
वेठीला धरले जाते. त्यांना हे राजकारणी समोर येतात ते दहशतीने झुकवतात. मागे भले तुम्ही त्याला शिव्या द्याल. पण त्याच्यासमोर त्याला बोलायची तुमची हिम्मत नसते. असले गुंड प्रवृत्तीचे लोक त्यांच्या पदाचा गैरफायदा घेतात आणि जनतेची सर्व प्रकारची पिळवणूक करतात.
समाजावर...
दहशत आणि गुंडगिरी हीच संस्कृती आहे हा प्रभाव समाजावर पडतो. यातून जनतेचा एका रॉबिनहूड चा शोध सुरु होतो. जो या अन्यायातून आणि लुटालुटीतून त्यांना वाचवेल. पण सर्वात मोठा प्रभाव हा आहे कि असा समाज आर्थिक आणि सामाजिक प्रगती केव्हाही करू शकत नाही. असे राजकारणी धर्म जात प्रदेश या ना त्या कारणाने नेहमी समाजात फूट पाडत असतात. आणि तथाकथित पदवीधर सुशिक्षित असलेले अडाणी लोक जेव्हा त्यांचे ऐकू लागतात तेव्हा देशाचे पतन निश्चित असते. माणूस यापेक्षा कोणताही धर्म जगात नाही हे ज्या समाजाला कळाले तो समाज नेहमी प्रगती करतो. म्हणूनच भारताची स्वतंत्र झाल्यापासूनची प्रगती पाहून सर्व जग तोंडात बोटे घालते. भारताच्या तुलनेत कोणतीही धनसंपत्ती नसताना इतक्या वेगाने प्रगती जगाच्या पाठीवर क्वचित कोणत्या देशाने केली आहे.
देशावर....
असे राजकारणी देशाचा सौदा करायला देखील मागेपुढे बघत नाहीत. त्यातून देशाचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांना निकृष्ट दर्जाचे अन्न , त्यांचे सातत्याने होणारे मृत्यू आणि त्याबद्दल बेफिकिरी दिसून येते. अशी शेकडो उदाहरणे देता येतील ज्यामुळे देश असले राजकारणी देश विकायला देशील तयार होतात. आणि सामान्य जनतेला त्याबद्दल काहीही कळत नाही. उदाहरणार्थ : चीन ने भारताची १८ हजार स्क्वेअर किलोमीटर सीमेची जमीन बळकावली आहे. पण त्याबद्दल मीडिया आणि विरोधक मूग गिळून गप्प आहेत.
राजकारणी चांगला असेल तर..
जनतेवर...
जनतेच्या हिताची कामे होतात. लोकांना आधार वाटतो. मनातून त्या नेत्यासमोर आदराने झुकतात. अशा राजकारण्याला सन्मान देणे हे मनापासून होते.
समाजावर:
एक प्रेरणास्रोत म्हणून असे चांगले राजकारणी काम करतात. ज्यामुळे समाजाला चांगली कामे करण्यासाठी उत्साह येतो आणि समाज एका चांगल्या शांततापूर्ण मार्गाने स्थिर आणि आनंदी आयुष्याकडे जातो. एक शांतता पूर्ण आणि आनंदी आयुष्य समाजाला अशा चांगल्या राजकारण्यांमुळे जगता येते.
देशावर...
देशाच्या हिताचे निर्णय घेण्यात असले चांगले राजकारणी कोणतीही तडजोड करत नाहीत. त्यांच्यासाठी देश सर्वप्रथम असतो. केवळ तोंडाने सारखे नेशन फर्स्ट बोंबलणारे राजकारणी धूर्त असतात. त्यांच्यापासून जनतेने सावध राहायला हवे. जे चांगले काम करतात त्यांना असे बोलण्याची गरजच पडत नाही. लोकांना अशी चांगली कामे डोळ्यांनीच स्पष्ट दिसतात. अशा चांगल्या राजकारण्यांमुळे देश ज्ञान विज्ञान क्रीडा शिक्षण अर्थ कृषी सैन्य - संरक्षण अशा सगळ्याच क्षेत्रात चांगली प्रगती करतो.
-लेख संकलन आणि संपादन:
विद्यार्थी मित्र प्रा. रफीक शेख
डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
Post a Comment